Wednesday, August 3, 2011

अवि-स्मरणीय : चार मित्र : भाग १

श्रीकृष्ण नगरातल्या ह्या चार मित्रांमध्ये क्रमवारी नाही! मैत्री कधी, कुठे आणि कशी सुरु होते हे अचूक सांगणं बरेचदा कठीण असतं. ओळख बरीच आधीपासून असते, नकळत कधीतरी आपण मैत्री ह्या अवस्थेला पोहोचतो. ती पुढे जास्त जास्त दृढ होत जाते. इथे दिसणारी क्रमवारी कालमानाप्रमाणे लावली आहे. आणि कालमानाप्रमाणे असं व्हावं हे केवळ विधिलिखित!


१.

१९६४ साली, आठवी पास झाल्यावर मी श्रीकृष्ण हायस्कूल सोडलं. (ती एक आणखी वेगळीच गोष्ट आहे, त्याबद्दल नंतर!). मी शाळेतून 'दाखला' घेऊन बाहेर पडत होतो. त्याच वेळी एक मुलगा शाळेत प्रवेश घेण्यासाठी ऑफिसच्या पायऱ्या चढत होता. मी नववीत दुसरीकडे चाललो होतो, हा आठवीत श्रीकृष्ण हायस्कूल मध्ये शिरत होता. त्यावेळी आमचं काही बोलणं झालं होतं की नाही तेही आठवत नाही. तो नवीनच राहायला आला होता काजूपाड्यामध्ये. तेव्हाचा काजूपाडा म्हणजे श्रीकृष्णनगरचाच भाग म्हणायचा. मोजकीच घरं... जाण्यायेण्याचा रस्ता कॉलनीतूनच. किंबहुना, सांस्कृतिक आणि व्यावहारिक दृष्टीने, श्रीकृष्णनगराचा अविभाज्य भागच! असो. तर, काही महिन्यातच आमची पुन्हा भेट झाली. बोलता बोलता विषय निघाला "क्रिस्टल रेडिओ" करण्याचा. योगायोगाने त्याच वर्षी, मी पण त्याच उद्योगामध्ये होतो.

आजच्या मोबाईल फोन, इंटिग्रेटेड सर्किट इत्यादी च्या जमान्यात, क्रिस्टल रेडिओ मधलं 'थ्रिल' सांगणं कठीण आहे - बॅटरी शिवाय चालणारा, हेडफोन मधून आवाज येणारा, फक्त मुंबई अ आणि ब एवढी स्टेशनं ऐकवणारा... त्याचा छोटासा डायोड आणायला लॅमिंग्टन रोड (दादासाहेब भडकमकर मार्ग) जावं लागायचं.

हळू हळू ओळख वाढत गेली. शाळेतल्या विज्ञान विषयाच्या गप्पा होत राहिल्या. ओळखीची मैत्री कधी झाली, आणि मैत्री 'मुरत' कशी गेली कळलं सुद्धा नाही. मोहन रावराणे जिवलग मित्र झाला... शाळेच्या त्या वर्षांमध्ये मोहन चतुरस्र होता. भाषा, शास्त्र विषयात तर उत्तम होताच, पण तो उत्तम चित्रकारसुद्धा होता. आज हे श्रीकृष्णनगर समूहावर सांगणं म्हणजे वेडेपणाच आहे, पण तेव्हा ही अतिशय खास गोष्ट होती! अभ्यासात हुशार असलेल्या मुलाने कॉलेज मध्ये सायन्सला जायला पाहिजे अशी एक तेव्हाची ठाम समजूत!

त्याप्रमाणे, बरेच सल्ले ऐकून मोहन पण गेला. बहुधा त्याचं मन रमत नव्हतं. राहून राहून त्याच्यातला कलाकार उचल खात होता. सांगायला म्हणून त्याने सायन्सच्या प्रयोगशाळेत दमायला होतं हे कारण पुढे केलं (असं आपलं मला वाटतं!). नेहमीप्रमाणे मनातलं बोलायला माझ्याकडे. आता, वयाने बरोबरचा मित्र एवढ्या मोठ्या प्रश्नावर काय बोलणार? मी एवढंच म्हटलं, 'तू 'आर्ट' ला गेलास तरी स्टुडीओ मध्ये तासनतास उभा राहणारच ना? पण तरी, तुझ्या मनाला पटेल तेच तू कर.'

मोहन आर्टला गेला... घोडदौडीच्या वेगाने प्रगती करत गेला... बक्षिसामागून बक्षिसं मिळवत गेला. कॉलनीत शिकवण्या करून स्वतःच्या शिक्षणाची सोय करत गेला. ह्यामध्ये गुपित काही नाही, आजही कॉलनीत मोहनला 'सर' म्हणणारे आहेत! मी पहात राहिलो... प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, अंतर्मनाला पटेल तेच पूर्ण भक्तिभावाने करणारा मोहन... मोहनचं आयुष्य म्हणजे 'उपासना' शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी आदर्श उदाहरण. काही काळ एका कॉलेज मध्ये शिक्षकाची नोकरी करून मोहनने आणखी एक धाडसी निर्णय घेतला. स्वतःचा व्यवसाय करण्याचा. आज कदाचित कोणाला त्यात विशेष वाटणार नाही - तो काळ वेगळा होता. काहीही पाठबळ नसताना, मध्यमवर्गीय मराठी मुलगा, एका वेगळ्याच क्षेत्रात व्यावसायिक होण्याची स्वप्नं पहात होता. नुसतीच स्वप्नं पहात नव्हता, ती साकार करायला सर्व शक्ती पणाला लावत होता. व्यवसायाला नाव पण काय अनुरूप ठेवलं होतं - 'व्याध'. हातात धनुष्यबाण घेऊन, नजर लक्ष्यावर ठेवून मोहनमधला व्याध निघाला होता.

औषध कंपन्यांच्या जीवघेण्या स्पर्धेच्या जगात मोहन उतरला होता. बरेचदा मी प्रभादेवीला त्याच्या स्टुडीओमध्ये भेटायला जात असे. व्यावसायिक मोहन म्हणजे वेगळंच व्यक्तिमत्व होतं! त्याची उंची, बोलण्यातला आत्मविश्वास, हाताखाली काम करणारे ज्युनियर्स... त्याचे बहुसंख्य clients औषध उद्योग जगतातले होते. त्या अनुषंगाने त्याची औषधांची माहिती कौतुकास्पद होती. पुढे मोहनने मोठा मामिया कॅमेरा घेतला. त्या काळाच्या फ्लॅश परावर्तन करण्यासाठी लावलेल्या 'छत्र्या', तो खास कॅमेरा आणि त्याच्यामागे उभा मोहन - आमच्या मैत्रीच्या सुरुवातीच्या काळात मी त्याला सत्यजित राय यांचा एक फोटो दाखवला होता. आता मला त्या फोटोची आठवण यायला लागली! कोणी म्हणेल, काय मित्राची स्तुती चालली आहे! पण प्रत्येक उदाहरण त्याच्या विशिष्ट संदर्भचौकटीत पाहिलं की ते किती चपखल बसतं ते लक्षात येईल!

आमची मैत्री कुठल्या आधारावर एवढी भक्कम उभी होती (आणि आहे!) हे सांगणं सोपं नाही. एवढं निश्चित, की आपल्या अंतर्मनाच्या हाकेला खंबीरपणे साद देणं, त्यासाठी पडेल ते कष्ट करणं (being loyal to one's inner convictions) हे मी मोहनकडून शिकलो. त्याहीपुढे, कोणत्याही किचकट प्रश्नाच्या दोन्ही बाजू समजून घेणं, प्रामाणिकपणे विचार करून, वेळ पडल्यास अप्रिय वाटण्याची शक्यता असली तरी सडेतोड मत आणि सल्ला देणं... हे मोहनचं खास वैशिष्ट्य. बोलण्याची तऱ्हा मुळातच मृदू... माझ्या व्यक्तिगत आशा बिकट प्रसंगी मोहनचे हे गुण प्रकर्षाने जाणवले. त्यामुळे आजही 'अवि, हे तुझं चुकलं' असं मोहनने म्हटलं तरी ते प्रियच असतं!

माझं परदेशी वास्तव्य झाल्यापासून (म्हणजे १९९४ पासून!) आमच्या भेटी कमी झाल्या. एरवी पत्रं लिहिणं ही माझी खासियत होती, तीही नंतर कमी कमी होत गेली. इ-मेल वर मोहन खरं तर कमीच भेटतो! (आता फेसबुक वर भेटायला लागला आहे!) पण दर वर्षी जून महिन्यात दोघांना ती पहिली भेट आठवते... मी दाखला घेऊन बाहेर पडत होतो आणि मोहन शाळेत प्रवेश घ्यायला शिरत होता...

दर जून महिन्यात आम्ही मैत्रीचा आणखी एक वाढदिवस झाला असं एकमेकांना सांगतो.

******************

अवि-स्मरणीय : चार मित्र : भाग २

२.


ही जोडगोळी... ह्यांच्याबद्दल वेगवेगळं लिहिणं कठीण आहे. खरं तर दोन्ही वेगळी व्यक्तिमत्व. एका वर्गातले, शाळा संपल्यावर कॉलेजमध्ये सारखंच शिक्षण घेतलेले... जवळ जवळ राहणारे. नेहमी बरोबर दिसणारे... तरीही वेगळे. आणि दोघेही माझे इतके प्रिय मित्र की त्यांचा उल्लेख बरोबरच होतो. माझ्यातला शिक्षक खर्या अर्थाने 'जागा' केला तो ह्या दोघांनी. हे आजपर्यंत मी त्यांनाही सांगितलं नसेल! त्यांना सांगितलं तर त्यांनाही आश्चर्य वाटेल. पण ते खरं आहे. आज मागे वळून पाहतांना हे खूप प्रकर्षाने जाणवतंय.

ओळख मूळची शाळेतलीच, पण दोघेही माझे वर्गबंधू नव्हते. आता श्रीकृष्णनगरात राहणारे म्हणजे जवळ काय आणि लांब काय...! गम्मत म्हणजे शाळेपासून जवळ जवळ मैत्री म्हणण्यासारखी ओळख असूनही, खरी मैत्री 'सुरु' झाली ती मी मेडिकल कॉलेजला गेल्यावर. आमच्या गप्पा कुठल्या विषयावरून सुरु झाल्या हे आज आठवणं कठीण आहे. एक निश्चित... गप्पातून गप्पा निघत जायच्या. बहुधा रात्री जेवणानंतर... कॉलनीत मधल्या एका चौरस्त्यावर. मग दहा वाजायचे... कधी अकरा, साडेअकरा... गप्पा सुरूच असायच्या. कोणी म्हणेल, "त्यात विशेष ते काय! त्यालाच आम्ही आजकाल 'कट्टा' म्हणतो". पण तेव्हा 'कट्टा' ही संकल्पना नव्हती!. नवी - जुनी गाणी, थोडंफार इतर संगीत, त्यावेळी येऊ घातलेला "मेरा नाम जोकर"... हे सगळं गप्पांमध्ये असायचंच. पण मग मध्येच विषयाला कलाटणी मिळायची. "अवि, तो हार्ट अटॅक येतो म्हणजे नक्की काय रे?" आता हे दोघे कॉमर्सचे विद्यार्थी. हे मेडिकल प्रश्न... त्यांना समजतील अशी पण तरीही शास्त्रीय दृष्ट्या बिनचूक अशी उत्तरं देणं म्हणजे जरा बिकटच. कधी इंग्रजी, कधी मराठी अशी कसरत करत, असे अनेक प्रश्न सोडवण्याची सवय तिथे झाली.

पण मैत्री ही अशा वरवर का होईना, रुक्ष वाटणाऱ्या चर्चांवर कुठे जमते! तरीही, त्या चर्चांमधून दुवे सांधले जात होते, एकमेकांचे स्वभाव समजले जात होते... परीक्षा झाल्या, पदव्या मिळाल्या, नोकरी व्यवसाय सुरु झाले, संसार सुरु झाले... भेटीगाठी थोड्या कमी झाल्या असतील... मैत्रीवर कधी कार्ड पाठवून शिक्कामोर्तब करायला लागत नव्हतं... "मैत्री दिवस"ही पाळले जात नव्हते तेव्हा! परगावाहून येऊन अवेळी फोन करून 'रात्री रहायला येतो' म्हणता येत होतं... आणि परदेशी गेल्यावर तर श्रीकृष्णनगरात येऊन भेट झाली नाही हे शक्यच नव्हतं! मग आठवणींचं पारायण - त्या गप्पा, गणेशोत्सवातला तो कार्यक्रम (सुहासच्या गाण्याचा), अमीर खां च्या गाण्याच्या आठवणी, पुण्याची मोटर सायकल वरची ती फेमस ट्रिप... सर्वात महत्वाचं म्हणजे आयुष्याच्या उंचसखल वाटेवर अनेक प्रकारच्या प्रसंगात मित्रांनी दिलेली साथ...

ह्यावर्षीच्या भारत भेटीत बोरिवलीचा योग नव्हता. पण ह्यावर्षी ह्या दोन मित्रांचा आवर्जून उल्लेख करायला खास कारण आहे. शिक्षक म्हणून विद्यापीठाने दिलेल्या पारितोषिकात अनेकांचा वाटा आहे. मी व्यवसायाने शिक्षक झालो १९७६ साली, पण त्या कलेची खरी उपासना कळत नकळत ह्या दोन मित्रांपासून सुरु झाली होती. कदाचित, डॉक्टर होऊन शिक्षकी पेशा पत्करण्याच्या मुळाशी, त्या रात्री-रात्रीच्या गप्पा, हे दोन मित्र आणि त्यांचे वैद्यकीय प्रश्न असतील... नव्हे, त्यांचा मोठाच सहभाग होता अशी मनोमनी खात्री वाटते...

मित्रांनो, ह्या बक्षिसावर नाव तुमचं, आणि श्रीकृष्ण नगरच्या त्या चौरस्त्याचं!

*******************

अवि-स्मरणीय : चार मित्र : भाग ३

३.


मला वाटतं श्रीकृष्ण हायस्कूलची ती SSC ची पहिली बॅच. पण माझी त्याची शाळेत ओळख जेमतेमच होती. तो शांत स्वभावाचा, उगीच पुढे न येणारा... त्यात मी त्याच्या ३ वर्षं मागे. रस्त्यात कधी भेटलो तर हात वर करायचा एवढंच. एकदा मी इस्त्रीवाल्याच्या दुकानावर कपडे घेण्यासाठी वाट पाहत उभा होतो. म्हणजे अधिकाऱ्यांच्या घराजवळच्या विहिरीच्या तिथे, वामन डोंगरे, बर्वे ह्यांच्या घरांजवळ... मी त्यावेळी इंटरला होतो असं अंधुक आठवतंय. तिथे हा भेटला. "काय कसं काय" पासून किरकोळ गप्पा सुरु झाल्या. भय्याने कपडे दिले, आणखी दहा कपड्यांना इस्त्री केली... कॉलेजच्या विषयावरून सुरु झालेल्या गप्पा आता चौफेर धावायला लागल्या होत्या. काही वर्षं एकाच शाळेत असून कधीच विशेष बोललो नव्हतो, त्याची भरपाई केल्यासारखे आम्ही बोलत सुटलो होतो. शेवटी घरी जायची आठवण झाली. "परत बोलूच" असं मी म्हणालो, पण तो म्हणाला, "बोलण्याची खात्री नाही, मी परवा जातो आहे. हा माझा पत्ता". सोलापूरच्या पॉलीटेक्निक चा पत्ता होता तो.

दोन आठवड्यातच आमची पत्रापत्री सुरु झाली.

लक्षात राहण्यासारखं अक्षर... bold strokes म्हणतात त्यापैकी. आमचा सगळा पत्रव्यवहार इंग्रजीत व्हायचा. का कोणास ठाऊक, पण दोघांच्या ते अगदी नैसर्गिक रीत्या अंगवळणी पडलं. विविध घटना, विज्ञान विषयक, दोघांच्या कॉलेज च्या बातम्या, आणि इतर बरंच काही. सुट्टीत तो घरी आला. सकाळी, संध्याकाळी, मनात येईल तेव्हा आम्ही ठरवून फिरायला जात असू. फिरायला अर्थातच नॅशनल पार्क मध्ये. कान्हेरीच्या रस्त्यावर दोन तीन मैल... कधी पक्का रस्ता सोडून जंगलातून.. तास, दीड तास, दोन तास... सुट्टी संपेपर्यंत हा क्रम चालू होता. त्यावेळी, पार्क मध्ये प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर पाच मिनिटात पक्ष्यांचे आवाज आणि एरवी शांतता यांचं राज्य असायचं. वनराणी, लायन सफारी ह्यांच्या आधीचे ते दिवस. रविवारच्या मुंबईकरांच्या झुंडी सोडून बाकी solitude अनुभवायला सर्वात उत्तम जागा. आणि थोडं आत कान्हेरीच्या रस्त्याला तर काय सांगावं! आमच्या सारख्यांच्या साठी पर्वणीच.

त्याला पत्रमित्र जमवायचा पण छंद होता. एक अमेरिकन मित्र, एक सिंहली (त्यावेळी श्रीलंकेचं नाव 'सिलोन'च होतं) मैत्रीण... पत्रामित्रांकडून चितारलेल्या चित्रात त्याने मला पण सहभागी करून घेतलं. सुट्टी संपल्यावर तो परत कॉलेजला गेला, आणि पत्रापत्री पुन्हा सुरु.

एक वर्षाने मला मेडिकलला प्रवेश मिळाला. तो पण इंजिनियरिंगचं शिक्षण संपवून कॉलनीत परत आला. मुंबईत त्याला नोकरी लागली. थोडं स्वातंत्र्य पण त्याबरोबर आलं. इंग्रजीवर प्रभुत्व होतं त्याचं, त्याच बरोबर वागण्या-बोलण्याची उत्तम तऱ्हा, बाहेरच्या जगात वावरण्याची सहजता होती त्याच्यात. एवढं असूनही, नवीनच मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करणं कल्पनेच्याही बाहेर होतं. कौटुंबिक वातावरणात आणि बाहेरच्या जगात आदर्श असल्यासारखा होता तो.

माझ्यापेक्षा ३ वर्षांनी मोठा असल्याने मला त्याच्याबरोबर नेहमी 'कम्फर्ट झोन' मध्ये असल्यासारखं वाटायचं. आणि मी मेडिकलला असल्याचं त्याला मनापसून कौतुक वाटायचं.माझी मेडिकल कॉलेजची सगळीच वर्षं या न त्या कारणाने काहीशी अडचणीची गेली. पहिल्या दोन वर्षात त्याचा मोठाच आधार होता. त्याच्या शाळेतल्या वर्गमित्रांचा एक ग्रुप होता. त्यातही त्याने मला सामील करून घेतलं.

त्यानंतर काहीतरी चुकलं... कारण मी कधीच विचारलं नाही, पण माझा हा "Friend - Philosopher - Guide" आतल्या आत कुठेतरी हरवला! "फिरायला जायचं का?" तर "आज वेळ नाही". "अमुक करायचं का?" "आज नको, नंतर कधीतरी"... मेडिकल च्या अभ्यासाचं प्रेशर वाढायला लागलं तसा मी होस्टेलवर राहायला गेलो. आमचा पत्रव्यवहार बंद पडला. भेटी पण बंद झाल्या. एक दिवस अचानक तो मेडिकल कॉलेजच्या आवारात भेटला. दुसऱ्या कोणाला तरी भेटायला आला होता. अचानक भेटला, मी त्याला माझ्या खोलीवर घेऊन गेलो. थोड्या अवघडून, पण तरी मोकळ्या गप्पा मारल्या. हळू हळू गेलेले दिवस परत आले. दोन तास गप्पा मारून मग तो परत गेला. तीन दिवसांनी त्याचं एक लांबलचक पत्र आलं! मधला काही महिन्यांचा काळ आम्ही दोघांनी पुसून टाकला. प्रश्न नाहीत, स्पष्टीकरणं पण नाहीत.

यथावकाश माझं कॉलेज पण संपलं. मी MBBS झालो ह्याचा त्यालाच जास्त आनंद झाला असावा! मी मेडिकल कॉलेज मध्ये, होस्टेलवर राहूनही दारूला स्पर्श केला नव्हता. त्या दिवशी हा म्हणाला, "लेट अस सेलेब्रेट"... मित्र म्हणून आणि व्यक्ती म्हणून माझाही त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. 'चिअर्स' म्हणून ग्लास उचलला आणि त्याने माझं अभिनंदन केलं.

माझी इंटर्नशिप सुरू होती... एक दिवस किरकोळ निमित्त होऊन हा आजारी पडला. एकातून दुसरं... म्हणता म्हणता विषमज्वरासारखा वाटणारा आजार बळावत गेला. के ई एम मध्ये त्याच्या वर्गातले सुद्धा दोन डॉक्टर होते... सर्व उपाय व्यर्थ गेले...

माझा "Friend - Philosopher - Guide"... सुधीर वाघ... तिशीच्या आतच आई, वडील, भाऊ, आणि मोठा मित्रांचा गोतावळा ... सर्वांना सोडून गेला.

*************