Wednesday, August 3, 2011

अवि-स्मरणीय : चार मित्र : भाग १

श्रीकृष्ण नगरातल्या ह्या चार मित्रांमध्ये क्रमवारी नाही! मैत्री कधी, कुठे आणि कशी सुरु होते हे अचूक सांगणं बरेचदा कठीण असतं. ओळख बरीच आधीपासून असते, नकळत कधीतरी आपण मैत्री ह्या अवस्थेला पोहोचतो. ती पुढे जास्त जास्त दृढ होत जाते. इथे दिसणारी क्रमवारी कालमानाप्रमाणे लावली आहे. आणि कालमानाप्रमाणे असं व्हावं हे केवळ विधिलिखित!


१.

१९६४ साली, आठवी पास झाल्यावर मी श्रीकृष्ण हायस्कूल सोडलं. (ती एक आणखी वेगळीच गोष्ट आहे, त्याबद्दल नंतर!). मी शाळेतून 'दाखला' घेऊन बाहेर पडत होतो. त्याच वेळी एक मुलगा शाळेत प्रवेश घेण्यासाठी ऑफिसच्या पायऱ्या चढत होता. मी नववीत दुसरीकडे चाललो होतो, हा आठवीत श्रीकृष्ण हायस्कूल मध्ये शिरत होता. त्यावेळी आमचं काही बोलणं झालं होतं की नाही तेही आठवत नाही. तो नवीनच राहायला आला होता काजूपाड्यामध्ये. तेव्हाचा काजूपाडा म्हणजे श्रीकृष्णनगरचाच भाग म्हणायचा. मोजकीच घरं... जाण्यायेण्याचा रस्ता कॉलनीतूनच. किंबहुना, सांस्कृतिक आणि व्यावहारिक दृष्टीने, श्रीकृष्णनगराचा अविभाज्य भागच! असो. तर, काही महिन्यातच आमची पुन्हा भेट झाली. बोलता बोलता विषय निघाला "क्रिस्टल रेडिओ" करण्याचा. योगायोगाने त्याच वर्षी, मी पण त्याच उद्योगामध्ये होतो.

आजच्या मोबाईल फोन, इंटिग्रेटेड सर्किट इत्यादी च्या जमान्यात, क्रिस्टल रेडिओ मधलं 'थ्रिल' सांगणं कठीण आहे - बॅटरी शिवाय चालणारा, हेडफोन मधून आवाज येणारा, फक्त मुंबई अ आणि ब एवढी स्टेशनं ऐकवणारा... त्याचा छोटासा डायोड आणायला लॅमिंग्टन रोड (दादासाहेब भडकमकर मार्ग) जावं लागायचं.

हळू हळू ओळख वाढत गेली. शाळेतल्या विज्ञान विषयाच्या गप्पा होत राहिल्या. ओळखीची मैत्री कधी झाली, आणि मैत्री 'मुरत' कशी गेली कळलं सुद्धा नाही. मोहन रावराणे जिवलग मित्र झाला... शाळेच्या त्या वर्षांमध्ये मोहन चतुरस्र होता. भाषा, शास्त्र विषयात तर उत्तम होताच, पण तो उत्तम चित्रकारसुद्धा होता. आज हे श्रीकृष्णनगर समूहावर सांगणं म्हणजे वेडेपणाच आहे, पण तेव्हा ही अतिशय खास गोष्ट होती! अभ्यासात हुशार असलेल्या मुलाने कॉलेज मध्ये सायन्सला जायला पाहिजे अशी एक तेव्हाची ठाम समजूत!

त्याप्रमाणे, बरेच सल्ले ऐकून मोहन पण गेला. बहुधा त्याचं मन रमत नव्हतं. राहून राहून त्याच्यातला कलाकार उचल खात होता. सांगायला म्हणून त्याने सायन्सच्या प्रयोगशाळेत दमायला होतं हे कारण पुढे केलं (असं आपलं मला वाटतं!). नेहमीप्रमाणे मनातलं बोलायला माझ्याकडे. आता, वयाने बरोबरचा मित्र एवढ्या मोठ्या प्रश्नावर काय बोलणार? मी एवढंच म्हटलं, 'तू 'आर्ट' ला गेलास तरी स्टुडीओ मध्ये तासनतास उभा राहणारच ना? पण तरी, तुझ्या मनाला पटेल तेच तू कर.'

मोहन आर्टला गेला... घोडदौडीच्या वेगाने प्रगती करत गेला... बक्षिसामागून बक्षिसं मिळवत गेला. कॉलनीत शिकवण्या करून स्वतःच्या शिक्षणाची सोय करत गेला. ह्यामध्ये गुपित काही नाही, आजही कॉलनीत मोहनला 'सर' म्हणणारे आहेत! मी पहात राहिलो... प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, अंतर्मनाला पटेल तेच पूर्ण भक्तिभावाने करणारा मोहन... मोहनचं आयुष्य म्हणजे 'उपासना' शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी आदर्श उदाहरण. काही काळ एका कॉलेज मध्ये शिक्षकाची नोकरी करून मोहनने आणखी एक धाडसी निर्णय घेतला. स्वतःचा व्यवसाय करण्याचा. आज कदाचित कोणाला त्यात विशेष वाटणार नाही - तो काळ वेगळा होता. काहीही पाठबळ नसताना, मध्यमवर्गीय मराठी मुलगा, एका वेगळ्याच क्षेत्रात व्यावसायिक होण्याची स्वप्नं पहात होता. नुसतीच स्वप्नं पहात नव्हता, ती साकार करायला सर्व शक्ती पणाला लावत होता. व्यवसायाला नाव पण काय अनुरूप ठेवलं होतं - 'व्याध'. हातात धनुष्यबाण घेऊन, नजर लक्ष्यावर ठेवून मोहनमधला व्याध निघाला होता.

औषध कंपन्यांच्या जीवघेण्या स्पर्धेच्या जगात मोहन उतरला होता. बरेचदा मी प्रभादेवीला त्याच्या स्टुडीओमध्ये भेटायला जात असे. व्यावसायिक मोहन म्हणजे वेगळंच व्यक्तिमत्व होतं! त्याची उंची, बोलण्यातला आत्मविश्वास, हाताखाली काम करणारे ज्युनियर्स... त्याचे बहुसंख्य clients औषध उद्योग जगतातले होते. त्या अनुषंगाने त्याची औषधांची माहिती कौतुकास्पद होती. पुढे मोहनने मोठा मामिया कॅमेरा घेतला. त्या काळाच्या फ्लॅश परावर्तन करण्यासाठी लावलेल्या 'छत्र्या', तो खास कॅमेरा आणि त्याच्यामागे उभा मोहन - आमच्या मैत्रीच्या सुरुवातीच्या काळात मी त्याला सत्यजित राय यांचा एक फोटो दाखवला होता. आता मला त्या फोटोची आठवण यायला लागली! कोणी म्हणेल, काय मित्राची स्तुती चालली आहे! पण प्रत्येक उदाहरण त्याच्या विशिष्ट संदर्भचौकटीत पाहिलं की ते किती चपखल बसतं ते लक्षात येईल!

आमची मैत्री कुठल्या आधारावर एवढी भक्कम उभी होती (आणि आहे!) हे सांगणं सोपं नाही. एवढं निश्चित, की आपल्या अंतर्मनाच्या हाकेला खंबीरपणे साद देणं, त्यासाठी पडेल ते कष्ट करणं (being loyal to one's inner convictions) हे मी मोहनकडून शिकलो. त्याहीपुढे, कोणत्याही किचकट प्रश्नाच्या दोन्ही बाजू समजून घेणं, प्रामाणिकपणे विचार करून, वेळ पडल्यास अप्रिय वाटण्याची शक्यता असली तरी सडेतोड मत आणि सल्ला देणं... हे मोहनचं खास वैशिष्ट्य. बोलण्याची तऱ्हा मुळातच मृदू... माझ्या व्यक्तिगत आशा बिकट प्रसंगी मोहनचे हे गुण प्रकर्षाने जाणवले. त्यामुळे आजही 'अवि, हे तुझं चुकलं' असं मोहनने म्हटलं तरी ते प्रियच असतं!

माझं परदेशी वास्तव्य झाल्यापासून (म्हणजे १९९४ पासून!) आमच्या भेटी कमी झाल्या. एरवी पत्रं लिहिणं ही माझी खासियत होती, तीही नंतर कमी कमी होत गेली. इ-मेल वर मोहन खरं तर कमीच भेटतो! (आता फेसबुक वर भेटायला लागला आहे!) पण दर वर्षी जून महिन्यात दोघांना ती पहिली भेट आठवते... मी दाखला घेऊन बाहेर पडत होतो आणि मोहन शाळेत प्रवेश घ्यायला शिरत होता...

दर जून महिन्यात आम्ही मैत्रीचा आणखी एक वाढदिवस झाला असं एकमेकांना सांगतो.

******************

अवि-स्मरणीय : चार मित्र : भाग २

२.


ही जोडगोळी... ह्यांच्याबद्दल वेगवेगळं लिहिणं कठीण आहे. खरं तर दोन्ही वेगळी व्यक्तिमत्व. एका वर्गातले, शाळा संपल्यावर कॉलेजमध्ये सारखंच शिक्षण घेतलेले... जवळ जवळ राहणारे. नेहमी बरोबर दिसणारे... तरीही वेगळे. आणि दोघेही माझे इतके प्रिय मित्र की त्यांचा उल्लेख बरोबरच होतो. माझ्यातला शिक्षक खर्या अर्थाने 'जागा' केला तो ह्या दोघांनी. हे आजपर्यंत मी त्यांनाही सांगितलं नसेल! त्यांना सांगितलं तर त्यांनाही आश्चर्य वाटेल. पण ते खरं आहे. आज मागे वळून पाहतांना हे खूप प्रकर्षाने जाणवतंय.

ओळख मूळची शाळेतलीच, पण दोघेही माझे वर्गबंधू नव्हते. आता श्रीकृष्णनगरात राहणारे म्हणजे जवळ काय आणि लांब काय...! गम्मत म्हणजे शाळेपासून जवळ जवळ मैत्री म्हणण्यासारखी ओळख असूनही, खरी मैत्री 'सुरु' झाली ती मी मेडिकल कॉलेजला गेल्यावर. आमच्या गप्पा कुठल्या विषयावरून सुरु झाल्या हे आज आठवणं कठीण आहे. एक निश्चित... गप्पातून गप्पा निघत जायच्या. बहुधा रात्री जेवणानंतर... कॉलनीत मधल्या एका चौरस्त्यावर. मग दहा वाजायचे... कधी अकरा, साडेअकरा... गप्पा सुरूच असायच्या. कोणी म्हणेल, "त्यात विशेष ते काय! त्यालाच आम्ही आजकाल 'कट्टा' म्हणतो". पण तेव्हा 'कट्टा' ही संकल्पना नव्हती!. नवी - जुनी गाणी, थोडंफार इतर संगीत, त्यावेळी येऊ घातलेला "मेरा नाम जोकर"... हे सगळं गप्पांमध्ये असायचंच. पण मग मध्येच विषयाला कलाटणी मिळायची. "अवि, तो हार्ट अटॅक येतो म्हणजे नक्की काय रे?" आता हे दोघे कॉमर्सचे विद्यार्थी. हे मेडिकल प्रश्न... त्यांना समजतील अशी पण तरीही शास्त्रीय दृष्ट्या बिनचूक अशी उत्तरं देणं म्हणजे जरा बिकटच. कधी इंग्रजी, कधी मराठी अशी कसरत करत, असे अनेक प्रश्न सोडवण्याची सवय तिथे झाली.

पण मैत्री ही अशा वरवर का होईना, रुक्ष वाटणाऱ्या चर्चांवर कुठे जमते! तरीही, त्या चर्चांमधून दुवे सांधले जात होते, एकमेकांचे स्वभाव समजले जात होते... परीक्षा झाल्या, पदव्या मिळाल्या, नोकरी व्यवसाय सुरु झाले, संसार सुरु झाले... भेटीगाठी थोड्या कमी झाल्या असतील... मैत्रीवर कधी कार्ड पाठवून शिक्कामोर्तब करायला लागत नव्हतं... "मैत्री दिवस"ही पाळले जात नव्हते तेव्हा! परगावाहून येऊन अवेळी फोन करून 'रात्री रहायला येतो' म्हणता येत होतं... आणि परदेशी गेल्यावर तर श्रीकृष्णनगरात येऊन भेट झाली नाही हे शक्यच नव्हतं! मग आठवणींचं पारायण - त्या गप्पा, गणेशोत्सवातला तो कार्यक्रम (सुहासच्या गाण्याचा), अमीर खां च्या गाण्याच्या आठवणी, पुण्याची मोटर सायकल वरची ती फेमस ट्रिप... सर्वात महत्वाचं म्हणजे आयुष्याच्या उंचसखल वाटेवर अनेक प्रकारच्या प्रसंगात मित्रांनी दिलेली साथ...

ह्यावर्षीच्या भारत भेटीत बोरिवलीचा योग नव्हता. पण ह्यावर्षी ह्या दोन मित्रांचा आवर्जून उल्लेख करायला खास कारण आहे. शिक्षक म्हणून विद्यापीठाने दिलेल्या पारितोषिकात अनेकांचा वाटा आहे. मी व्यवसायाने शिक्षक झालो १९७६ साली, पण त्या कलेची खरी उपासना कळत नकळत ह्या दोन मित्रांपासून सुरु झाली होती. कदाचित, डॉक्टर होऊन शिक्षकी पेशा पत्करण्याच्या मुळाशी, त्या रात्री-रात्रीच्या गप्पा, हे दोन मित्र आणि त्यांचे वैद्यकीय प्रश्न असतील... नव्हे, त्यांचा मोठाच सहभाग होता अशी मनोमनी खात्री वाटते...

मित्रांनो, ह्या बक्षिसावर नाव तुमचं, आणि श्रीकृष्ण नगरच्या त्या चौरस्त्याचं!

*******************

अवि-स्मरणीय : चार मित्र : भाग ३

३.


मला वाटतं श्रीकृष्ण हायस्कूलची ती SSC ची पहिली बॅच. पण माझी त्याची शाळेत ओळख जेमतेमच होती. तो शांत स्वभावाचा, उगीच पुढे न येणारा... त्यात मी त्याच्या ३ वर्षं मागे. रस्त्यात कधी भेटलो तर हात वर करायचा एवढंच. एकदा मी इस्त्रीवाल्याच्या दुकानावर कपडे घेण्यासाठी वाट पाहत उभा होतो. म्हणजे अधिकाऱ्यांच्या घराजवळच्या विहिरीच्या तिथे, वामन डोंगरे, बर्वे ह्यांच्या घरांजवळ... मी त्यावेळी इंटरला होतो असं अंधुक आठवतंय. तिथे हा भेटला. "काय कसं काय" पासून किरकोळ गप्पा सुरु झाल्या. भय्याने कपडे दिले, आणखी दहा कपड्यांना इस्त्री केली... कॉलेजच्या विषयावरून सुरु झालेल्या गप्पा आता चौफेर धावायला लागल्या होत्या. काही वर्षं एकाच शाळेत असून कधीच विशेष बोललो नव्हतो, त्याची भरपाई केल्यासारखे आम्ही बोलत सुटलो होतो. शेवटी घरी जायची आठवण झाली. "परत बोलूच" असं मी म्हणालो, पण तो म्हणाला, "बोलण्याची खात्री नाही, मी परवा जातो आहे. हा माझा पत्ता". सोलापूरच्या पॉलीटेक्निक चा पत्ता होता तो.

दोन आठवड्यातच आमची पत्रापत्री सुरु झाली.

लक्षात राहण्यासारखं अक्षर... bold strokes म्हणतात त्यापैकी. आमचा सगळा पत्रव्यवहार इंग्रजीत व्हायचा. का कोणास ठाऊक, पण दोघांच्या ते अगदी नैसर्गिक रीत्या अंगवळणी पडलं. विविध घटना, विज्ञान विषयक, दोघांच्या कॉलेज च्या बातम्या, आणि इतर बरंच काही. सुट्टीत तो घरी आला. सकाळी, संध्याकाळी, मनात येईल तेव्हा आम्ही ठरवून फिरायला जात असू. फिरायला अर्थातच नॅशनल पार्क मध्ये. कान्हेरीच्या रस्त्यावर दोन तीन मैल... कधी पक्का रस्ता सोडून जंगलातून.. तास, दीड तास, दोन तास... सुट्टी संपेपर्यंत हा क्रम चालू होता. त्यावेळी, पार्क मध्ये प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर पाच मिनिटात पक्ष्यांचे आवाज आणि एरवी शांतता यांचं राज्य असायचं. वनराणी, लायन सफारी ह्यांच्या आधीचे ते दिवस. रविवारच्या मुंबईकरांच्या झुंडी सोडून बाकी solitude अनुभवायला सर्वात उत्तम जागा. आणि थोडं आत कान्हेरीच्या रस्त्याला तर काय सांगावं! आमच्या सारख्यांच्या साठी पर्वणीच.

त्याला पत्रमित्र जमवायचा पण छंद होता. एक अमेरिकन मित्र, एक सिंहली (त्यावेळी श्रीलंकेचं नाव 'सिलोन'च होतं) मैत्रीण... पत्रामित्रांकडून चितारलेल्या चित्रात त्याने मला पण सहभागी करून घेतलं. सुट्टी संपल्यावर तो परत कॉलेजला गेला, आणि पत्रापत्री पुन्हा सुरु.

एक वर्षाने मला मेडिकलला प्रवेश मिळाला. तो पण इंजिनियरिंगचं शिक्षण संपवून कॉलनीत परत आला. मुंबईत त्याला नोकरी लागली. थोडं स्वातंत्र्य पण त्याबरोबर आलं. इंग्रजीवर प्रभुत्व होतं त्याचं, त्याच बरोबर वागण्या-बोलण्याची उत्तम तऱ्हा, बाहेरच्या जगात वावरण्याची सहजता होती त्याच्यात. एवढं असूनही, नवीनच मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करणं कल्पनेच्याही बाहेर होतं. कौटुंबिक वातावरणात आणि बाहेरच्या जगात आदर्श असल्यासारखा होता तो.

माझ्यापेक्षा ३ वर्षांनी मोठा असल्याने मला त्याच्याबरोबर नेहमी 'कम्फर्ट झोन' मध्ये असल्यासारखं वाटायचं. आणि मी मेडिकलला असल्याचं त्याला मनापसून कौतुक वाटायचं.माझी मेडिकल कॉलेजची सगळीच वर्षं या न त्या कारणाने काहीशी अडचणीची गेली. पहिल्या दोन वर्षात त्याचा मोठाच आधार होता. त्याच्या शाळेतल्या वर्गमित्रांचा एक ग्रुप होता. त्यातही त्याने मला सामील करून घेतलं.

त्यानंतर काहीतरी चुकलं... कारण मी कधीच विचारलं नाही, पण माझा हा "Friend - Philosopher - Guide" आतल्या आत कुठेतरी हरवला! "फिरायला जायचं का?" तर "आज वेळ नाही". "अमुक करायचं का?" "आज नको, नंतर कधीतरी"... मेडिकल च्या अभ्यासाचं प्रेशर वाढायला लागलं तसा मी होस्टेलवर राहायला गेलो. आमचा पत्रव्यवहार बंद पडला. भेटी पण बंद झाल्या. एक दिवस अचानक तो मेडिकल कॉलेजच्या आवारात भेटला. दुसऱ्या कोणाला तरी भेटायला आला होता. अचानक भेटला, मी त्याला माझ्या खोलीवर घेऊन गेलो. थोड्या अवघडून, पण तरी मोकळ्या गप्पा मारल्या. हळू हळू गेलेले दिवस परत आले. दोन तास गप्पा मारून मग तो परत गेला. तीन दिवसांनी त्याचं एक लांबलचक पत्र आलं! मधला काही महिन्यांचा काळ आम्ही दोघांनी पुसून टाकला. प्रश्न नाहीत, स्पष्टीकरणं पण नाहीत.

यथावकाश माझं कॉलेज पण संपलं. मी MBBS झालो ह्याचा त्यालाच जास्त आनंद झाला असावा! मी मेडिकल कॉलेज मध्ये, होस्टेलवर राहूनही दारूला स्पर्श केला नव्हता. त्या दिवशी हा म्हणाला, "लेट अस सेलेब्रेट"... मित्र म्हणून आणि व्यक्ती म्हणून माझाही त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. 'चिअर्स' म्हणून ग्लास उचलला आणि त्याने माझं अभिनंदन केलं.

माझी इंटर्नशिप सुरू होती... एक दिवस किरकोळ निमित्त होऊन हा आजारी पडला. एकातून दुसरं... म्हणता म्हणता विषमज्वरासारखा वाटणारा आजार बळावत गेला. के ई एम मध्ये त्याच्या वर्गातले सुद्धा दोन डॉक्टर होते... सर्व उपाय व्यर्थ गेले...

माझा "Friend - Philosopher - Guide"... सुधीर वाघ... तिशीच्या आतच आई, वडील, भाऊ, आणि मोठा मित्रांचा गोतावळा ... सर्वांना सोडून गेला.

*************

Saturday, July 30, 2011

"अवि-स्मरणीय"- ४ : चार मित्र (प्रास्ताविक)

"अवि-स्मरणीय"च्या पुढच्या भागाला प्रास्ताविक लिहायची आवश्यकता भासली कारण तो भाग चार मित्रांवर आहे. आता, प्रचंड मित्रवर्गामधून चार मित्रांना निवडायचं म्हणजे किती जणांवर अन्याय होईल हे सांगणे नलगे! म्हणून आधीच स्पष्टीकरण. मित्रांमध्ये क्रमवारी नाही! तसंच, मित्र श्रीकृष्ण नगरापुरते मर्यादित आहेत असंही नाही! मी सर्वप्रथम प्रास्ताविकात लिहिल्याप्रमाणे, काही  व्यक्तींचा जवळून संपर्क येतो, काहींचा येत नाही. काही मित्रांचा अशाच जवळिकीमुळे आपल्या आयुष्यावर खूप खोल ठसा उमटतो. मागे वळून पाहताना जाणवतं, की आपण आज जे आहोत त्यात काही मित्रांचा असा हातभार आहे,  की त्यावर नेमकं बोट ठेवता येईल. आपण त्यांच्या कडून काही शिकलो आहोत,  त्यांनी आपल्याला खूप काही दिलं आहे, जे आजपर्यंत जपलं गेलं आहे. त्यांच्याबरोबर जे 'शेअर' केलं ते आजपर्यंत जपून ठेवावंसं वाटलं आहे... पुस्तकात ठेवलेल्या फुलांच्या पाकळ्या असाव्या तसं. एक उदाहरण -  मी MBBS झाल्यावर शिक्षकी पेशा पत्करला ह्याचं बऱ्याच मित्रांना, हितचिंतकांना आणि समव्यावसायिकांना आश्चर्य वाटलं. 'मास्तरकी' करून काय मिळणार तुला? हा प्रश्न अनेकांनी विचारला. पण आश्चर्य न वाटणारे पण होते, आणि उत्तेजन देणारे पण भेटले. मी शिक्षकी पेशात पहिल्या दिवसापासूनच रुळलो... आजपर्यंत चुकूनही त्या निर्णयाबद्दल शंका आली नाही. विद्यार्थ्यांचं अमाप प्रेमही मिळालं. किंबहुना, विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवण्यासाठीच प्रथम फेसबुक मध्ये आलो! ज्या दिवशी इथल्या (पर्थ मधल्या) विद्यार्थ्यांनी "अवार्ड फॉर एक्सलंस इन टीचिंग" साठी माझं नाव दिलं आणि नंतर त्याची परिणती अवार्ड मिळण्यात झाली तेव्हा मी अंतर्मुख झालो. हे पारितोषिक खरं तर माझ्या विद्यार्थ्यांचं. असा विचार करता करता अचानक वीज चमकल्यासारखी जाणीव झाली... आपण चांगले शिक्षक होण्याच्या श्रेयामध्ये आपल्या काही मित्रांचा फार मोठा वाटा आहे.
अशी अनेक उदाहरणं देता येतील...



अशा अनेक मित्रांपैकी, श्रीकृष्णनगरातले हे चार मित्र.  आणि अर्थातच, त्यांच्या आठवणींशी निगडित अशा नगराच्या आठवणी! 
(क्रमशः)

Tuesday, July 26, 2011

अवि-स्मरणीय - ३ : एक, दोन, तीन, चार...

"एक, दोन, तीन, चार... श्रीकृष्णनगरची पोरे हुषार!" आवाज जवळ यायला लागलाय... मला उशीर झालेला आहे! "भिजण्याच्या लायकीचे" कपडे घालून मी पण पळत पळत जातो. "गोविंदा! गोविंदा! गोविंदा!" लहान मुलं, 'मोठी मुलं', बरेचसे 'काका' ... सगळा आवाज गळ्यातून... ढोल नाही, ताशा नाही... नाचत नाचत, धावत धावत, पुढच्या घरी. एकेमेकांच्या खांद्यावर हाताच्या कड्या करून जल्लोष..."गरम पाणी पायजे! गरम पाणी पायजे!!" (हे 'अशुद्धलेखन' नाही, त्या गदारोळात "पायजे"च बरोबर होतं!). वरच्या मजल्याच्या ग्यालरीत कठड्यावर पाण्याच्या बादल्या आणि हंडे तयार आहेत. पहिला हंडा अंगावर येतो अनु हुडहुडी भरते. पुन्हा जल्लोष "गरम पाणी पायजे!" पण नाही... मग एक मामी नैवेद्याचं ताट घेऊन येतात. केळी, दहीकाला, शिरा, जे असेल ते. बावडेकर काकांच्या (म्हणजे पोवळ्यांच्या समोरचे) खांद्यावर भलं मोठं पातेलं विराजमान झालेलं असतं. त्यात भर पडते.

पावसाची रिपरिप सुरु झालेली असते. पुढच्या घरावर हंडी बांधलेली आहे. चला रे चला. "अरे ए सुभाष, विल्या (सुभाष आणि विलास कोलगे), कुठे आहात रे?"... "हां हां येतो... सुभाष, विलास, निम्गुळकर, अरविंद (कुलकर्णी)...खालची फळी खांदे अडकवून तयार. पुन्हा दोन चार नावं... मधली फळी... कोणीतरी घसरून पडतो. आम्ही छोटे लोक बाजूला मजा बघत उभे असतो. तेवढ्यात वरून एक मोठं पातेलं रिकामं होतं... आहाहाहा गरम पाणी. तोवर घसरून पडलेला सावरलेला असतो. वरचा मजल चढायला सुरुवात करतो. “गोविंदा............!” हंडी फुटते. नैवेद्याच्या पातेल्यात भर पडते.

हंड्या काही फार उंच असायच्या असं नाही... कॉलनीत एका मजल्याच्या वर घरंच नव्हती! हंडीच्या दोरीला नोटा बांधलेल्या नसायच्या. आणि हंडी कोणी फोडायची ह्याचे वाद नसायचे. शेवटी ते एकुलतं एक श्रीकृष्ण नगर होतं! तिथे एकच 'गोविंदा'! जे होतं ते त्या एकाच श्रीकृष्णनगराचं होतं, तिथल्याच गोपालांचं होतं. कोणी जास्त शहाणपणा केला तर कोणीही काका दम भरायला हजर होते. सगळे आपलेच होते, प्रेमात आणि रागात.

पावसात आणि घराघरातून ओतलेल्या पाण्यात भिजत बाल गोपाल चालले आहेत...आणखी चार घरं... "चला रे चला.. प्रसाद वाटताहेत काका"... काही कोरडे पोहे, काही काल्यातले, गूळ, मनुका आणि बेदाणे, केळ्याचे आणि इतर फळांचे तुकडे, साखरफुटाणे, खोबऱ्याचे तुकडे, आणि बरंच काही - सगळ्याचा छानपैकी 'खराखुरा' काला झालेलं असा तो प्रसाद म्हणजे भिजलेल्या पण तरीही ना दमलेल्या मुलांना पर्वणी असे. दर १५-२० मिनिटांनी ओंजळीत घेऊन स्वाहा करायचा... हात? ते तर पावसात आणि वरून ओतलेल्या पाण्यात आपोआपच धुतले जात होते. रस्त्यावर थोडाफार चिखल असायचा, पण तोही असाच धुतला जात होता.

ह्या घरी सामसूम दिसते आहे. "घरात नाही पाणी घागर... उपाशी रे.... उपा___शी!"  अरेच्चा... ह्या काकूंच्या लक्षात नाही आलं 'गोविंदा' इतका जवळ आला आहे! "अग... मुलं आली बघ .... पाणी आण पाणी आण..."  हंडे बाहेर येतात... काका रिकामे करतात.

"एक, दोन, तीन चार... श्रीकृष्ण नगरची पोरं हुषार..." रस्त्यारस्त्यावरून, घराघरावरून गोविंदा चालला आहे. दहा, अकरा, बारा... एक वाजला. कृष्णाच्या देवळापासून सुरु झालेलं गोविंदा पुन्हा देवळापाशी आला... प्रसादाचं पातेलं भरत होतं, रिकामं होत होतं... आता ते पूर्ण रिकामं झालेलं असतं. काका लोक लहान मुलांना घरी पाठवायचा प्रयत्न करताहेत. आम्ही मात्र हळूच नदीच्या पाण्याचा अंदाज घेतो आहोत. पाणी कमरेच्या वर नाहीये. काकांनी आधीच तो अंदाज घेतलेला असतो - त्यांना माहित असतं की ही पोरं डुंबायला जाणार आहेत. पाणी गढूळ दिसत नाही म्हणजे पुराची शक्यता नाही. काल विशेष पाऊस पण नव्हता. आठ दहा मुलं मग तासभर नदीमध्ये.

कडकडून भूक लागलेली आहे, दोन वाजायला आले. घरी नैवेद्य दाखवून झालेला असेलच ... गरम गरम जेवण...

संध्याकाळचे वेध लागलेले असतात. पालखी निघते. पांढरा स्वच्छ सदरा आणि पायजमा आणि त्यावर टोपी घातलेले भाई कर्णिक पालखीच्या पुढे... नंतर जोशी काका आले... (अगदी सुरुवातीच्या दिवसात जोशी काका नव्हते!) "मार्गी हळू हळू चाला... मुखाने कृष्ण कृष्ण बोला"... भाई 'लीड' करताहेत, बाकीचे कोरस मध्ये त्यांच्यामागून गाताहेत. तिन्हीसांजा होताहेत... पालखीच्या बरोबरच्या समया.. कृष्णाची धीरगंभीर आवाजातली गाणी...

काय गम्मत आहे पहा! मला जेवढे असे दिवस आठवताहेत त्यात सकाळी गोविंदाच्या वेळी पाऊस आणि संध्याकाळी उघडीप असंच चित्र मनाच्या डोळ्यांसमोर येतं आहे... श्रीकृष्ण नगरची जादू!

कृष्णजन्म असो, गणपती असो की शिवजयंती... मोठ्या संख्येने मिरवणूक हि व्हायलाच हवी. शिवजयंतीची पण पालखी असायची. भाईंची आणखी एक खासियत (नंतर जोशीकाकांची सुद्धा) म्हणजे स्वरचित ओळी स्वरबद्ध करून गायच्या. (ह्या ओळी मी तरी कुठल्या गाण्यात ऐकलेल्या नाहीत, त्यामुळे त्या श्रीकृष्ण नगरच्या वातावरणात जन्मलेल्या आहेत असं मी धरून चालतो!) चू. भू. द्या. घ्या. "पुनरपि शिवबा जन्मा या... महाराष्ट्राचा मुजरा घ्या..."   ... मला आठवणारी श्रीकृष्णनगरातली शिवजयंती ही बाबासाहेब पुरंदरे प्रसिद्ध झाले नव्हते, "रायगडाला जाग" आलेली नव्हती, आणि शिवाजी महाराजांचं राजकीय भांडवल झालं नव्हतं, तेव्हाची आहे.

कॉलनीमधला सर्वात मोठा उत्सव गणेशोत्सव होता ह्याबाबत वाद नसावा. गणपतीच्या एक दोन महिने आधीच उत्सवाचं वातावरण दिसायला लागे. वर्गणीची सक्ती नाही, किती द्यावी ह्याबाबत दबाव नाही... घरचं कार्य असल्यासारखे कार्यकर्ते वावरताहेत... नाटकाची तयारी, मुलांच्या कार्यक्रमांची तयारी, बाहेरून कोणते कार्यक्रम आणायचे ह्याच्या चर्चा... श्रीकृष्ण भगिनी समाजाची तयारी... सगळीकडे धामधूम. मतभेद असलेच तर मला तरी आठवत नाहीत!

गणेश चतुर्थीला हॉल सुसज्ज व्हायचा. सुरुवातीला बरीच वर्षं हॉलच्या समोरची जागा पक्की बांधलेली नव्हती. खूप नंतर तिथे फरशी आली. बांबूच्या चौकटीवर ताडपत्रीचं छप्पर आणि जमिनीवर कार्यक्रमांसाठी ताडपत्र्या अंथरलेल्या. हॉल आणि समोरची जागा सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्रच झालेलं असायचं. सकाळी 'नेहमीचेच यशस्वी' जमलेल्या सगळ्यांना घेऊन गणपती आणायला जायचे. सकाळ संध्याकाळ आरत्यांचा जल्लोष... पहिल्या दिवशी बहुधा कीर्तन इत्यादी... एका संध्याकाळी भगिनी समाजाचं हळदीकुंकू. एक दिवस मुलांचे कार्यक्रम.

स्थानिक कलाकारांचं नाटक म्हणजे एक पर्वणी. कॉलनी एवढी लहान असूनही, इतक्या वर्षांनंतर आठवण राहील एवढी 'स्थानिक प्रतिभा' तिथे होती ह्याचं राहून राहून कौतुक वाटतं. कितीही नावं घेतली तरी काही निसटून जायची भीती! माझ्या आठवणीतला १९५८ ते १९६७-६८ पर्यंतचा तो काळ म्हणजे खरोखरच सुवर्णकाळ असल्यासारखं वाटतं.

बजेटात बसेल त्याप्रमाणे बाहेरचे कार्यक्रम आणले जात. अंधशाळेचा वाद्यवृंद, सुधा करमरकरांच्या बाल रंगभूमीचा 'अल्लादिन', वि. र. गोड्यांच्या नकलांचा कार्यक्रम, सचिन (होय, सचिन पिळगावकर) चा डान्स, सुरेश हळदणकर यांचं गाणं... किती किती सांगू! काही बाहेरच्या व्यावसायिक कार्यक्रमांना हॉलचं स्टेज कधी कधी लहान पडायचं, पण कार्यक्रमांची गोडी कमी झाली नाही!

इतक्या सगळ्या आठवणींमध्ये थोडंफार विस्मरण साहजिक आहे, तसंच काही चित्रांचे मनातले ठसे पक्के असणंहि साहजिक आहे. असे काही क्षण, असे काही कार्यक्रम...

स्थानिक कलाकारांच्या एका नाटकात (आता नाव पण आठवत नाही), खलनायक, नायिकेच्या कुरूप नवऱ्याला उद्देशून "हाईड" असं ओरडतो. (डॉ. जेकिल & मि. हाईड ह्या गोष्टीच्या संदर्भात)... त्यावेळी प्रसंग नाट्यमय करायला पडद्यामागून मोठ्या झांजेचा (cymbal , band मध्ये असते ती) प्रचंड आवाज केला गेला. प्रेक्षक खरोखर दचकले होते!

"प्रेम तुझा रंग कसा" हे नाटक व्यावसायिक होता की स्थानिक ते आता आठवत नाही, पण मनात पक्की समजूत आहे ते स्थानिक असावं... माझ्या आठवणीतलं सर्वात उत्तम नाटक - कॉलनीत पाहिलेलं.

वि. र. गोड्यांच्या नकला म्हणजे एक मेजवानीच! हिटलरच्या नकलेतला आवेश (अर्थातच मूक नाट्य म्हणून!) चार्ली चाप्लीनच्या तोडीचा. आचार्य अत्रे तर १०१%. एकपात्री 'एकच प्याला' चं विडंबन ह. ह. पु. वा. करणारं. तात्कालिक राजकारणावर - नेहरू सुधाकरच्या भूमिकेत आणि यशवंतराव चव्हाण सिंधूच्या. सिंधू म्हणते, मी आजन्म आपल्या पायाशी राहीन वगैरे... आणि नेहरू (सुधाकर) : "लेकिन मैं तुझे यूंही ठुकरा दूंगा". हा प्रसंग आणि अत्र्यांची नक्कल संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पार्श्वभूमीवर! ह्या सगळ्या नकलांना एन्ट्री अर्थातच विंगेतून. आणि मग "तुम्हा सर्वांचे लाडके पंतप्रधान पंडित नेहरू येत आहेत..." प्रेक्षकांचे डोळे विंग कडे... "येत आहेत तुमच्या मधून!" आणि खरेखुरे वाटणारे 'नेहरू' नमस्कार करत, पुलाच्या बाजूने, प्रेक्षकांच्या दोन भागांच्या मधून...

खरं तर अशा तुटक आठवणींमधून पूर्ण चित्रं उभं राहणं कठीण आहे... हा आपला दुबळा प्रयत्न. १९६८-६९ च्या सुमारास आमची 'तरुण' पिढी पुढे यायला लागली होती. पुढे माझा मेडिकलचा अभ्यास आणि आईचं प्रदीर्घ आजारपण ह्यामुळे माझा सहभाग कमी होत गेला... पुढे कॉलनी सोडली, पण ती केवळ 'तांत्रिक' दृष्ट्या... कॉलनी आणि तिथलं मित्रमंडळ आणखी बरेच वर्षं खंबीर होतं! कारण बोरिवलीत तरी बराच काळ वास्तव्य होतं. पण त्या सुमारास स्थानिक कलाकारांची संगीत स्पर्धा झालेली आठवते. शेखर (गोरे) तबलावादक! (त्यावेळी जितेंद्र नुकताच चिमोटे गुरुजींकडे शिकायला सुरुवात करत होता). शेखरने मला विचारलं, सुहास (बावडेकर, दुसरा कोण!!!) ला व्हायोलिनची साथ करशील का? नाही म्हणायचा प्रश्नच येत नव्हता! अभिषेकी बुवांची पहिलीच भावगीतं तेव्हा नुकतीच तुफान लोकप्रिय झाली होती. तालमीसाठी आम्ही दोन्ही बसवली होती – “शब्दावाचून कळले सारे” आणि “माझे जीवन गाणे”. प्रत्यक्ष स्टेजवर “माझे जीवन गाणे”...

अवि-स्मरणीय च्या ह्या भागाचा ह्या घटनेने शेवट व्हावा हे पण विधिलिखित असावं! आज सुहास पण आपल्यात नाही. त्या वर्षानंतर माझी व्हायोलिनची तालीम कमी कमी होत गेली... आयुष्यात सुरु करून अर्धवट राहिलेल्या अनेक गोष्टींपैकी ही एक. त्यानंतर मी जास्त जास्त 'कानसेन' होत गेलो... संगीताचा अभ्यास भरपूर केला, नात्यातल्या आणि मित्रपरिवारातल्या अनेकांना संगीतात रस घ्यायला लावलं... इथे ऑस्ट्रेलियामध्ये पण हिंदुस्तानी संगीतावर बोललो, अजून असे कार्यक्रम (ध्वनिमुद्रित संगीताच्या सहाय्याने) करायचा मानस आहे - इथे माझ्या आजूबाजूच्या बऱ्याच 'गोऱ्या' मित्रामान्दालींना रस आहे... पण व्हायोलीन, ते माझ्याकडे अजूनही आहे, पण मूक झालं आहे... आठवणीनी पापण्यांच्या कडा ओलावल्या नाहीत तर ते श्रीकृष्ण नगर नव्हेच!

**********************

Monday, July 25, 2011

अवि-स्मरणीय - २. श्रीकृष्णनगर - 'तेव्हाचं'!

माझे आई-वडील श्रीकृष्णनगरात रहायला आले ते वर्ष होतं १९५२. नक्की महिना कोणता होता माहीत नाही, पण तेव्हा कॉलनीचं वय साधारण ३ वर्षं असावं, आणि माझं वय होतं काही महिने! सुरुवातीच्या आठवणी अर्थातच आठवणी नाहीत, ऐकीव आहेत.



कॉलनीमध्ये तेव्हा अक्षरशः हाताच्या बोटावर मोजण्याइतकी घरं होती. त्यावर्षीचा एक बोलका फोटो माझ्या आल्बम मध्ये आहे. त्या फोटोतला परिसर दहा-बारा वर्षात बदलला, आणि आता तर कल्पनातीत आहे. आम्ही तेव्हा "कुळकर्ण्यांच्या घरात" रहात होतो. म्हणजे, माझ्या समजुतीप्रमाणे, प्लॉट क्र. ८७. मार्च १९५३ मध्ये सीता निवास (१११) बांधलं गेलं आणि लवकरच आम्ही तिथे बिऱ्हाड हलवलं. १९५६ च्या सुमारास माझे आजी-आजोबा आणि मामा (प्रधान) कॉलनीत रहायला आले. तेव्हा ते पाटकरांच्या घरात रहात. म्हणजे प्लॉट क्र. ७८, 'मंगल धाम'. हे सारं तपशीलवार सांगायचं कारण असं की सुरुवातीच्या आठवणी ह्या दोन जागांशी निगडीत आहेत. आणि अगदी पहिल्या आठवणी १९५६-५७ च्या सुमाराच्या आहेत. तेव्हा आजीकडे जायचं असलं तर शॉर्टकट होता. १११ (सीता निवास) मधून निघालं की डावीकडे... शेजारची तीन घरं नव्हतीच. १०७ (दणाईत, डॉ. देशपांडे) मध्ये मोठी बाग होती - कुळकर्ण्यांची बाग. पुढे प्लॉट क्र. ३९/४० मधल्या झुडुपातून वाट काढत, आंब्याच्या मोठ्या झाडाखालून पलीकडे, ५८ किंवा ५९ मधून पुढे. श्रीकृष्ण हायस्कूल ची मोठी इमारत नव्हती - खरं वाटत नाही ना? हळू हळू घरांची संख्या वाढत गेली, तशी ती वाट बंद झाली.



कॉलनीच्या हॉलच्या आजूबाजूला काहीही नाही! माळरान (कदाचित शेतजमीन असेल, आठवत नाही), थेट दहिसर पर्यंत वस्ती नाही, काही ‘पाडे' सोडून. मागे काजूपाड्यात 'वरच्या कॉलनीच्या मागे थोडीफार घरं, बाकी शाळेच्या मैदानाच्या आसपास चार झोपड्या. अभिनव नगर त्यावेळी 'प्रपोजल' च्या अवस्थेत सुद्धा नसेल. मोकळं मैदान, ताडाची उंच उंच झाडं, आणि बरीचशी आंब्याची झाडं. ती आंब्याची झाडं कोणाच्या मालकीची होती माहीत नाही, पण एकदा आम्ही मुलं कैऱ्या पाडत असतांना एक प्रचंड आकाराचा रखवालदार लांबलचक काठी घेऊन आमच्या मागे लागलेला आठवतो! कधी कोणी आगरी ताडाच्या झाडावर चढून ताडगोळे तोडून आणी, आणि जवळच सोलून ताजे ताजे विकायला बसे. दीड-दोन आण्याचे एक डझन.



अभिनव नगरच्या डोंगराच्या टोकाला (आता तिथल्या शाळेचं मागचं गेट आहे त्याच्या जवळ) राष्ट्रीय उद्यानाचे दोन बंगले - हॉलिडे कॉटेजेस - असत. तिथून दगडाधोंड्यांच्या वाटेने खाली उतरलं की सरळ सती बागेचा रस्ता. बाकी लायन सफारी नाही, की वनराणी नाही. आणि राष्ट्रीय उद्यान म्हणजे केवळ नॅशनल पार्क किंवा नुसता 'पार्क' होता. त्याचं अधिकृत नाव होतं 'कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान' – त्याच्या कुशीत वसलेलं श्रीकृष्णनगर, जिथे सगळं श्रीकृष्णमय होतं! श्रीकृष्ण विद्यालय होतं, श्रीकृष्णाचं देऊळ होतं, आणि थोड्याशाच घरांमध्ये, पण भरपूर मुलं होती!



आख्खी कॉलनीच बोरिवली मध्ये एकाकी पडल्यासारखी वस्ती होती तेव्हा! पश्चिमेकडची स्टेशन जवळची वस्ती, पूर्व बाजूचं दौलत नगर, कस्तुरबा रोड, दत्तपाडा ह्यांच्या मानाने अंतर बरंच जास्त वाटायचं. स्टेशन पण आताच्या मानाने खूप लहान - इन मीन तीन प्लॅटफॉर्म! एक आणि दोन वर बोरिवली लोकल थांबायच्या. तीन नंबर वर विरार कडे जाणाऱ्या आणि विरारहून येणाऱ्या गाड्या. बाहेरगावच्या गाड्या पण तीन नंबरवर. ४ आणि ५ नंबरचे पण बरेच नंतर झाले.



रिक्षा...? J भलतंच काय! बोरिवली तेव्हा ठाणे जिल्ह्यात होती - मुंबईची हद्द जोगेश्वरीला असायची. स्टेशनच्या बाहेर टांगे उभे असायचे. टांग्याचे आठ आणे (म्हणजे नंतरचे ५० पैसे!) फार वाटायचे. चार-दोन खाजगी गाड्या टॅक्सी म्हणून चालून जायच्या. आम आदमी "तेज चल!... एक दो ... एक दो..." करत जायचा. बोरिवली मुंबईमध्ये आल्यावर सुद्धा टॅक्सी तिथे यायला काही वर्षं जावी लागली, आणि रिक्षा तर आमच्यासाठी "अलीकडची गोष्ट" आहे. मुख्य रस्ता (म. गांधी रस्ता) आजच्या मानाने १/४ रुंदीचा असावा. पण रात्री ८ नंतर निर्मनुष्य वाटायचा. स्टेशन जवळ एक-दोन चहाची दुकानं - त्यांना 'हॉटेल' म्हणणं म्हणजे विनोद, पण त्यांच्या नावात मात्र 'होटल' असायचं. मात्र राऊत यांचं ‘वेस्टर्न हेअर कटिंग सलून’ हा एक विशेष 'landmark' होता! पुढे हेमराज हायस्कूल आणि रस्त्याच्या कडेच्या 'वाड्या' सोडल्यास बाकी शून्य. हेमराज हायस्कूल च्या पूर्वेला (रस्त्याच्या उत्तरेला) शेतं आणि भाजीचे मळे. ओंकारेश्वर मंदिर पण नंतर आलं (त्याचं बांधकाम सुरु असलेलं मला चांगलंच आठवतंय). वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे तर नव्हताच. रस्ता वळून सरळ श्रीकृष्ण नगरकडे उतारावरून जायचा. रस्त्याच्या बाजूला गोठे - पंडित रामकृपाल अर्जुन तिवारी यांचं श्रीकृष्ण डेअरी फार्म होतं ते! पंडित तिवारी म्हणजे एक खास व्यक्तिमत्व होतं. त्यांच्याबद्दल नंतर लिहू. (ते दिवस भय्यांचा द्वेष करण्याचे नव्हते! J)

नदीवरचा पूल होता अर्ध्या रुंदीचा आणि कमी उंच. खूप वर्षांनंतर, बेस्ट बस सुरु झाली तेव्हा नवा (सध्याचा) पूल झाला. नदीच्या पात्रात तेव्हा अनेक विहिरी होत्या. जास्त खोल नसल्या तरी नदीपात्रात असल्याने त्यात बहुधा बारा महिने पाणी असायचं. गोठेवाले भय्ये नदीवर म्हशींना 'आंघोळ' घालायला आणायचे. सगळ्या म्हशी पुलाजवळ रस्ता ओलांडून नदीकडे जात. सर्वसाधारणपणे त्या आपल्याच नादात संथपणे जात, पण कधी उधळल्या तर रस्त्यावरच्या लोकांची त्रेधातिरपीट उडे.

दहिसर नदीला तेव्हा कचरापेटीचं रूप नव्हतं. पावसाळ्यात पूर आला तरी कॉलनीच्या रस्त्यावर पाणी जास्त येत नसे. आणि पूर तर दर पावसाळ्यात हमखास यायचा. पाणी वाढलं कि आधी पात्रातल्या विहिरी दिसेनाशा व्हायच्या. आणखी चार सहा फूट वाढलं कि कॉलनीत कुजबूज सुरु व्हायची. मग मुलं (आणि हो, मोठी माणसं सुद्धा) 'पूर' बघायला पुलाजवळ गोळा व्हायची. दर पावसाळ्यात किमान एकदा पाणी इतकं वाढत असे कि पूल पूर्ण पाण्याखाली. (तो पूल आताच्या पुलापेक्षा थोडा कमी उंच होतं हे लक्षात घ्या!). हायवे नव्हता आणि म्हणून हायवेचा पूलही नव्हता. त्यामुळे पुलावरून पाणी गेलं कि श्रीकृष्णनगराचा बाहेरच्या जगाशी संपर्क पूर्ण तुटून जाई. मुंबईतल्या ऑफिसेसला जाणाऱ्यांना त्या दिवशी सक्तीची सुट्टी मिळे. ऑफिसला फोन करण्याचीही सोय नसे. १९६०-६५ च्या दरम्यान सगळ्या कॉलनीत मिळून पाच-सात घरात फोन असावेत. ते सुद्धा पावसात बंद असण्याचीच शक्यता जास्त!

बोरिवलीमधलं एकुलतं एक पोस्ट ऑफिस तेव्हा पश्चिमेला होतं. बोरिवलीचा समावेश मुंबईत झाला तेव्हा संपूर्ण बोरिवली "मुंबई ६६" होती. पूर्वेला पोस्ट ऑफिस झाल्यावर मग ९२ आणि ६६ अशी विभागणी झाली. कस्तुरबा रोड वर जास्त करून भाजीवाले इत्यादी असत, आणि थोडीफार दुकानं. मोठी खरेदी बहुतेक पश्चिमेला. मोठी मंडई पश्चिमेला... नाही, आता आहे तिथे नाही! दौलत नगर रेल्वे फाटक आणि स्टेशन यांच्या मधल्या जागेत, कौलारू मंडई होती ती! कच्च्या जमिनीच्या जागेत, जमिनीवर चिकचिकाट अशी खास मंडई होती ती! भाज्या, फळांचे ठेले... एका बाजूला मटन आणि मासळीचा विभाग... असं काम होतं तिथे. त्यावेळी "बोरिवली वेस्ट" म्हणायची पद्धत नव्हती! रेल्वे लाईन ओलांडून जायचं म्हणजे "पलीकडे जायचं". 'पलीकडे' घोडबंदर रोड (तेव्हा तो एस व्ही रोड नव्हता!) होता एवढासा - आणि तरी मोकळा मोकळा. स्टेशन च्या समोर छोट्या छोट्या इमारतींमध्ये कोर्ट आणि पोलीस स्टेशन, मधल्या जागेत डॉ बागवे यांचं हॉस्पिटल. छोट्याशा बैठ्या इमारतीत, रस्त्याला लागून भांडारकरांच दुकान आणि शेजारीच डॉ कुळकर्णी यांचा दवाखाना. थोडं पुढे (दक्षिणेकडे) गेलं की डॉ पालकरांचा दवाखाना, मग डॉ हिंदळेकर आणि डॉ करोडे. हे इथे लिहायचा उद्देश असा, कि एक डॉ नाईक (कस्तुरबा रोड) सोडले तर बोरिवली पूर्वेत डॉक्टर नव्हते! पण त्याबद्दल नंतर!

पश्चिमेला गोराईकडे जाणारा टिळक रोड. त्याच्यावर बाभई आणि वझिरा म्हणजे छोटीशी गावठाण. दूर अंतरावर एकसर, शिंपोली सारखी छोटी गावं. तिथे कुठे जायचं म्हणजे परगावी गेल्यासारखं वाटे. मंडपेश्वरच्या गुंफा आणि त्यापलीकडे सेंट फ्रान्सिस द'असिसी शाळा आणि चर्च, किंवा दक्षिणेला पोयसरचं चर्च आणि मेरी इमाक्युलेट शाळा म्हणजे तर एक वेगळीच दुनिया. बाकी बोरिवली पश्चिम म्हणजे छोट्या छोट्या वाड्या...

कापडचोपड, सणासुदीची खरेदी, हे सगळं तर बोरिवलीमध्ये जवळ जवळ होतच नसे. श्रीकृष्णनगरात रहायला येणाऱ्या बऱ्याच जणांचं 'मुंबई कनेक्शन' असायचं - बरेच अर्थातच नवीनच मुंबईत आलेले असायचे. पण मध्यमवर्गीय मराठी व्यक्तींना दादर-गिरगावचं प्रेम तर असणारच!

तर अशा बोरिवली मधलं, असं श्रीकृष्ण नगर - मुंबईत असूनही मुंबईत नसलेलं.

******************************

अवि-स्मरणीय - १ : प्रास्ताविक.

आजवर जिथे जिथे राहिलो त्या प्रत्येक ठिकाणाच्या आठवणी कैकदा येतात. अनेक शहरं आणि गावं काही महिने, काही वर्षं राहिल्यावर आपलीशी होऊन जातात. पण श्रीकृष्णनगरला त्या आठवणींच्या जगात फारच विशेष स्थान आहे. 'त्या' काळात तिथे मोठ्या झालेल्या व्यक्तींना श्रीकृष्ण नगर आपल्याबरोबरच मोठं झाल्यासारखा वाटत असावं! आणि एका अर्थाने ते खरंही आहे. मोजकीच घरं, कच्चे रस्ते, खांबांवरून नेलेल्या विजेच्या तारा, कमी दाबाने येणारं सोसायटीच्या विहिरीचं किंवा अंगणातल्या विहिरीचं पाणी... प्रत्येक जण प्रत्येकाला ओळखत असण्याचे ते दिवस. मोठ्या पिढीतल्या सगळ्यांना "काका" हे उपनाव (किंवा तत्सम) आपोआप जोडलं जाण्याचे ते दिवस. ... कोणी म्हणेल, मराठी मुलांमध्ये ते तर आजपण दिसून येतं. खरं आहे, पण सगळ्यांनी एकमेकाला ओळखण्याचे 'ते' दिवस गेले असं मात्र मला राहून राहून वाटतं.

पण श्रीकृष्णनगराची खासियत ही की, सामाजिक जीवनात तेव्हा एकसंधपणा होता – निदान मुलांच्या बाबतीत तरी होता! माझ्या आठवणी त्या एकसंधपणाच्या आहेत. खरं सांगायचं तर श्रीकृष्णनगरच्या आठवणींमध्ये कडवटपणाला जागाच नाही. कधी कुठे खरचटलं असेल... तर त्याचं कधीच विस्मरण झालेलं आहे. गोड आठवणी ह्या चिरंतन असतात. माझ्या आठवणी म्हणूनच निखळ आठवणी आहेत. घटना असोत की व्यक्ती असोत - त्यात कुठेही judgmental attitude नाही.

कितीही छोटा समाज असला तरी शेवटी सगळी माणसंच, त्यात गैरसमज, मतभेद, हेवेदावे हे असायचेच. अनेक ठिकाणी छोट्या घरांमधून मोठी, अविभक्त कुटुंबं रहायची.बऱ्याच घरांमध्ये भाडेकरू असायचे. कौटुंबिक अडचणी, हेवेदावे, घरमालक-भाडेकरू मतभेद - साधारण मध्यम वर्गीय समाजात कालानुरूप जे जे असतं ते सगळं असायचं. शिळोप्याच्या गप्पांमध्ये भलंबुरं बरंच काही बाहेर येत असेलही. माझ्या आठवणीत, जे चांगलं दिसलं आणि ज्याचा माझ्या आयुष्यावर चांगला परिणाम झाला, तेवढंच राहिलं आहे.

माझ्या आठवणीतलं श्रीकृष्णनगर खऱ्या अर्थाने सुसंस्कृत श्रीकृष्णनगर आहे.

 
कोणाही  एका  व्यक्तीच्या  आठवणी  कमीजास्त  प्रमाणात (बहुधा जास्तच! J) आत्मकेंद्रित असू शकतात. हा प्रमाद माझ्या हातूनही घडला असण्याची शक्यता आहे. त्यासाठी आधीच क्षमायाचना करून ठेवतो! उलटपक्षी हे पण सांगावसं वाटतं की, आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आणि प्रत्येक प्रसंगाचा आपल्या जडणघडणीत निश्चितच हातभार असतो अशी माझी पक्की धारणा आहे. आणि माझ्या बाबतीत हे खरं आहे असं मला मनापासून वाटतं. काही व्यक्तींचा जवळून संपर्क येतो, काहींचा तेवढ्या जवळून येत नाही हाच काय तो सूक्ष्म फरक. आपल्या कॉलनीचा त्यावेळचा आकार आणि त्या काळातली लोकसंख्या पाहता, श्रीकृष्णनगराने त्या वयात जे संस्कार केले त्याचा माझ्या आयुष्यात फार मोठा वाटा आहे. कॉलनीच्या आठवणी काढताना म्हणूनच डोळे ओलावतात.



मुलं मोठी होतात, आम्ही पण झालो, आमची मुलं आयुष्यात आमच्याही पुढे निघून गेली. बरोबरचे बरेच जण  आजी-आजोबा सुद्धा झाले, तर बरोबरचे काही जण आज आपल्यात नाहीतही. आमच्या वर्गातले आम्ही दहा-पंधरा वर्षांचे असताना लहान लहान असलेली मुलं तेव्हा 'लहान' वाटायची, ती सुद्धा आपल्यासारखीच वयाने मोठी झाली आहेत. आमच्या लहानपणी पन्नाशी-साठीचे असलेले काका, आजोबा आणि आज्या, मावश्या आणि आत्या आजूबाजूला असायच्या. आता कधी कधी स्वतःलाच आश्चर्य वाटतं, अरेच्चा! आपण पण आता तेवढेच झालो की! कालाय तस्मै नमः. हे चक्र तर सगळीकडेच सुरु असतं, पण श्रीकृष्णनगरच्या त्या छोट्याशा समाजाच्या पार्श्वभूमीवर, आज कोणी तरुण मुलाला किंवा मुलीला पाहिलं की लगेच ते दिवस आठवतात. पटकन तोंडात शब्द येतात, "अरे! तू 'त्या ह्याचा' किंवा 'त्या ह्याची' ना?" मग एखादी आठवण - बहुधा अशा धर्तीवर : "अरे तुझ्या बाबाने आणि मी एकदा शाळेत अशी काहीतरी खोडी केली होती... बाईंनी आम्हा दोघांना तास भर अंगठे धरून उभं केलं होतं!"

श्रीकृष्णनगर सोडून गेल्यावर तर अशा गोष्टींचं जास्तच अप्रूप. पुन्हा डोळे पाणावतात आणि म्हणावंसं वाटतं "लहानपण देगा देवा..." असा साखरेचा ठेवा श्रीकृष्ण नगर सोडून कुठे मिळणार?

ह्या समूहाच्या यादीमध्ये अनेक ओळखीची नावं दिसतात. बहुतांश 'आद्य' श्रीकृष्णनगर वासीयांच्या तिसऱ्या पिढीतली असावीत! ह्या आठवणींच्या निमित्ताने कुठे काही दुवे साधले गेले तर मला अत्यंत आनंद होईल. 'हरवलेले' वर्गमित्र, इतर मित्र, अशा सर्वांच्या पुढच्या पिढीने संपर्क साधला तर अक्षरशः दुधात साखर! माझ्या बरोबरच्या बहुतेकांना फेसबुक इत्यादीवर शोधायचे प्रयत्न बहुधा असफल होतात! ह्या आठवणींमधून कोणाला असे दुवे सापडले तर जरूर संपर्क साधा, मला खूप बरं वाटेल!

********************************

अथ....

ह्या ब्लॉगने प्रथम अवतार घेतला खरं तर ४-५ वर्षांपूर्वी, पण प्रत्यक्ष लिहायचा योग काही येत नव्हता. फेसबुकवर माझ्या पहिल्या निवासस्थानाचा (श्रीकृष्ण नगर, बोरीवली, मुंबई) समूह आला, त्यात मी काही आठवणी लिहायला सुरुवात केली. त्यांना जो प्रतिसाद मिळाला तो भारावून टाकणारा आहे. विशेष म्हणजे त्या समूहात बरीचशी तरुण मंडळी आहेत - तरुण आमच्या पिढीच्या मानाने, बहुतेक तर आई-बाबा झालेले आहेत! ह्या ब्लॉगवरच्या लिखाणाचा उगम त्याच्यातच आहे. अर्थातच, हा ब्लॉग खऱ्या अर्थाने सुरु होण्याचं श्रेय माझ्या तिथल्या बंधू-भगिनींना आहे.