Saturday, July 30, 2011

"अवि-स्मरणीय"- ४ : चार मित्र (प्रास्ताविक)

"अवि-स्मरणीय"च्या पुढच्या भागाला प्रास्ताविक लिहायची आवश्यकता भासली कारण तो भाग चार मित्रांवर आहे. आता, प्रचंड मित्रवर्गामधून चार मित्रांना निवडायचं म्हणजे किती जणांवर अन्याय होईल हे सांगणे नलगे! म्हणून आधीच स्पष्टीकरण. मित्रांमध्ये क्रमवारी नाही! तसंच, मित्र श्रीकृष्ण नगरापुरते मर्यादित आहेत असंही नाही! मी सर्वप्रथम प्रास्ताविकात लिहिल्याप्रमाणे, काही  व्यक्तींचा जवळून संपर्क येतो, काहींचा येत नाही. काही मित्रांचा अशाच जवळिकीमुळे आपल्या आयुष्यावर खूप खोल ठसा उमटतो. मागे वळून पाहताना जाणवतं, की आपण आज जे आहोत त्यात काही मित्रांचा असा हातभार आहे,  की त्यावर नेमकं बोट ठेवता येईल. आपण त्यांच्या कडून काही शिकलो आहोत,  त्यांनी आपल्याला खूप काही दिलं आहे, जे आजपर्यंत जपलं गेलं आहे. त्यांच्याबरोबर जे 'शेअर' केलं ते आजपर्यंत जपून ठेवावंसं वाटलं आहे... पुस्तकात ठेवलेल्या फुलांच्या पाकळ्या असाव्या तसं. एक उदाहरण -  मी MBBS झाल्यावर शिक्षकी पेशा पत्करला ह्याचं बऱ्याच मित्रांना, हितचिंतकांना आणि समव्यावसायिकांना आश्चर्य वाटलं. 'मास्तरकी' करून काय मिळणार तुला? हा प्रश्न अनेकांनी विचारला. पण आश्चर्य न वाटणारे पण होते, आणि उत्तेजन देणारे पण भेटले. मी शिक्षकी पेशात पहिल्या दिवसापासूनच रुळलो... आजपर्यंत चुकूनही त्या निर्णयाबद्दल शंका आली नाही. विद्यार्थ्यांचं अमाप प्रेमही मिळालं. किंबहुना, विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवण्यासाठीच प्रथम फेसबुक मध्ये आलो! ज्या दिवशी इथल्या (पर्थ मधल्या) विद्यार्थ्यांनी "अवार्ड फॉर एक्सलंस इन टीचिंग" साठी माझं नाव दिलं आणि नंतर त्याची परिणती अवार्ड मिळण्यात झाली तेव्हा मी अंतर्मुख झालो. हे पारितोषिक खरं तर माझ्या विद्यार्थ्यांचं. असा विचार करता करता अचानक वीज चमकल्यासारखी जाणीव झाली... आपण चांगले शिक्षक होण्याच्या श्रेयामध्ये आपल्या काही मित्रांचा फार मोठा वाटा आहे.
अशी अनेक उदाहरणं देता येतील...



अशा अनेक मित्रांपैकी, श्रीकृष्णनगरातले हे चार मित्र.  आणि अर्थातच, त्यांच्या आठवणींशी निगडित अशा नगराच्या आठवणी! 
(क्रमशः)

No comments: