Thursday, February 23, 2012

डॉ. उज्वला (रेगे) दळवी : डॉक्टर आणि लेखिका


जून १९६७... रुइया कॉलेज मधला पहिला आठवडा. फिजिक्सच्या तासाला प्रा. पर्वते यांचं लेक्चर होतं. सरांनी सुरुवात केली : "ह्यावर्षी (नेहमीप्रमाणे!) आपल्या कॉलेजमध्ये बोर्डाच्या यादीवरची (मेरिट लिस्ट) मुलं आलेली आहेत. बोर्डात पहिला आलेला विद्यार्थी सुद्धा आपल्या कॉलेज मध्ये आहे. ह्या सर्वांचं कौतुक म्हणून, मी टक्केवारी सांगेन त्याप्रमाणे त्या मुलांनी उभं राहावं - आपण सर्व मिळून त्यांचं अभिनंदन करू." 'बोर्डात आलेल्या' विद्यार्थ्यांपैकी एक होती उज्वला रेगे. खरं तर सरांनी केलेल्या कौतुकामध्ये थोडीशी ओशाळून गेल्यासारखी दिसत होती! पुढच्या दोन वर्षात माझ्या दृष्टीने तिची ओळख केवळ 'बोर्डात आलेली रेगे' एवढीच होती. प्रकर्षाने जाणवलं ते असं की तिच्या चेहऱ्यावर '' ची बाधा अजिबात नव्हती. अतिशय शांत आणि नम्र अशी विद्यार्थिनी होती ती.

पुढे, रुइया कॉलेज मधून रग्गड १६ विद्यार्थी एक साथ जी. एस. मेडिकल कॉलेज मध्ये गेले. त्यात उज्वला पण. तिथे सुद्धा तिची ओळख अभ्यासू, हुशार आणि शांत विद्यार्थिनी अशीच होती. आज मी हे लिहितो आहे, पण मेडिकल कॉलेजच्या त्या पाच वर्षात ह्याच्या पलीकडे तिची माझी ओळख नव्हती. फार काय, तिला किती बक्षिसं मिळाली त्याचीही मला गणती नव्हती. ओळख होती ती केवळ 'आहे एक वर्गभगिनी' एवढीच. एक तर मला थोडे मित्र होते, आणि मैत्रिणी तर नव्हत्याच!

एमबीबीएस चे दिवस सरल्याला ३६ वर्षं होऊन गेली. अलीकडेच काही जण मुंबईला पुनर्भेटीसाठी जमले होते, पण स्थळ - काळाच्या अभावी बऱ्याच जणांना कळलंही नव्हतं. फेसबुक च्या कृपेने जुने वर्गमित्र हळू हळू व्हर्च्युअल जगतात भेटायला लागले. मधली वर्षं जणू नव्हतीच असं वाटायला लागलं! गम्मत म्हणजे कॉलेजच्या दिवसात 'काय कसं काय' एवढ्यापुरतीच ओळख असणारे जिवाभावाच्या मित्रांसारखे 'बोलायला' लागले. जगभर विखुरलेल्या वर्गमित्रांना जोडणारा दुवा अर्थातच जी एस मेडिकल कॉलेज! एक दिवस आमच्या माजी विद्यार्थ्यांच्या फेसबुक समूहावर उज्वलाताईंच (आता उज्वला दळवी) पण आगमन झालं. फेसबुक वरच्या गप्पांच्या ओघात कळलं की त्यांनी सौदी अरेबिया मधल्या अनुभवांवर पुस्तक लिहिलं आहे. इंटरनेट वर त्याबद्दल माहिती पहात असतांना त्यांच्या इतर लिखाणाच्या लिंक्स सापडल्या.

वाचायला सुरुवात केली आणि एकदम जाणवलं, अभ्यासातल्या आणि डॉक्टरकी मधल्या हुशारीला तोडीस तोड अशी लेखनशैली त्यांच्याकडे आहे. मी लेखक नाही आणि समीक्षकही नाही. तेव्हा साचेबंद वाक्यात मी त्यांच्या लेखनाचं वर्णन मी करणार नाही! मात्र त्यांचं लेखन कुठे सापडेल ते मी सांगेन - 'अंतराळ' ह्या नेट वरच्या मराठी नियतकालिकात. 'अंतराळ' वर आणखी इतर लेखकांच्या कार्याचा पण प्रचंड खजिना आहे. डॉ. उज्वला दळवींच्या लिखाणासाठी, डाव्या बाजूला "सहभाग" लिंक आहे ती क्लिक करा. यादीमध्ये त्यांचं नाव बरंच खाली आहे. ह्या वेबसाईट वर आता "dynamic font" वापरला जातो, पण काही अडचण आल्यास, 'नूतन' नावाचा font मिळवण्यासाठी लिंक आहे.

'पर्दाफाश' आणि 'भाऊचा धक्का' मध्ये त्यांच्या सौदी अरेबियाच्या अनुभवांची झलक मिळेल. 'दिल्या घरी तू' (कथा) आणि 'मावळतीचा मधुचंद्र' (कविता) थेट हृदयाला भिडतील. पण सावधान! इतर काही कवितांच्या शीर्षकांवर जाऊ नका... पण इतर वाचकांचा आनंद मी कशाला हिरावून घेऊ? तुम्हीच वाचा! आणि हो! 'पुनर्भेट' हे त्यांच्या एका कवितेचं शीर्षक सुद्धा आहे.
(त्यांच्या सौदी विषयी पुस्तकाचं नाव आहे ‘सोन्याच्या धुराचे ठसके’.)
डॉ. उज्वला (रेगे) दळवी : अभिनंदन!

1 comment:

Dr. Ujjwala Dalvi said...

अरे बाबा अविनाश, त्या हरभऱ्याच्या झाडाचा चिमुकला जीव तो केवढा! त्याला माझं वजन पेलणार आहे का? मी आपली जमिनीवरच बरी आहे रे.

त्या अंतराळमध्ये मी काहीही चिकटवलं आहे. काही कविता अतिशय बाळबोध आणि पोरकट आहेत. त्या सगळ्याचं ‘ताईचं लेखन’ या आपुलकीने कौतुक केलंस त्यानेच मी भरून पावले.
-उज्ज्वला.